'पापी व पुण्यवान'
पांडव १२ वर्षांचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास संपवून परत आले तेव्हा त्यांनी आपल्या राज्याची मागणी दुर्योधनाकडे केली. पाच पांडवांना निदान पाच गावे द्यावी, अशी कमीत कमी मागणी श्रीकृष्णाने दुर्योधनाकडे करण्याचा अधिकार त्यांना दिला होता त्या शिष्टाईसाठी श्रीकृष्ण हस्तिनापुरात आले तेव्हा त्यांनी राजा दुर्योधनाकडे मुक्काम करून त्यांच्याकडेच पंचपक्वानांचे भोजन घ्यावे, असे कौरवांनी त्यांना सुचविले, पण, श्रीकृष्णांनी त्याची विनंती अमान्य करून विदुराकडे मुक्काम करून त्यांच्याकडेच भोजन घ्यायचे ठरविले. विदुर हे महान विद्वान, राजकारणपटू व विरक्त सज्जन होते. दासीपुत्र होते, गरिबावस्थेत राहत होते. विदुरांनी श्रीकृष्णाचे मनापासून स्वागत केले आपल्या गरिबखान्यात (घरात) त्यांची उत्तम बडदास्त ठेवली. श्रीकृष्णाला भोजनासाठी विदुरांनी आपल्या ऐपतीनुसार 'कण्या' शिजविल्या होत्या. कण्या म्हणजे गहू किंवा ज्वारीच्या भरड पिठाचा सांजा. त्या कण्या श्रीकृष्णाने आवडीने खाल्या. त्यांनी राजा दुर्योधनाच्या पंचपक्वान्नाला अव्हेरून साध्या कण्या खाल्ल्या. असे का केले श्रीकृष्णांनी ! कारण कौरवांचा राजा दुर्योधन हा महापापी, अन्यायी, दुष्कर्मा होता. त्याच्या राजवाड्यात राहून त्याच्या पक्वान्नांचा आस्वाद घेणे म्हणजे पाप्याला उत्तेजन देणे गरीब, दासीपुत्र विदुर हा पुण्यवान सज्जन होता. त्याच्या घरच्या साध्या कण्या खाणे पुण्यकर्म होते. दुष्टाच्या पाप्याच्या घरच अन्न पापमय असत अन् ते खाणाऱ्यालाही पापकृत्य करायला लावते. उलट पुण्यवान, संत, सज्जनांच्या घरचे साधे भोजन माणसाला पुण्यवान बनवते, सत्कृत्य करण्याचं सामर्थ्य प्रदान करते. गोष्ट ऐकल्यावर मी आईला विचारल, 'आई, पाप अन् पुण्य म्हणजे काय ? पापी कुणाला म्हणाव ? अन् पुण्यवान्, सज्जन कोण ?' आई म्हणाली, पापपुण्याची व्याख्या तुकाराम महाराजांनी अशी सांगितली आहे, 'परोपकार ते पुण्य पाप ते परपीडन' लोकांना सत्कर्मांत मदत करणे म्हणजे परोपकार, त्यालाच पुण्य म्हणतात आणि लोकांना जे छळतात, त्रास देतात, त्याची धनसंपत्ती जबरदस्तीने हिसकवून घेतात, अशी दृष्कृत्ये म्हणजे पाप करणारी माणस म्हणजे पापी माणस, अन् लोकांना अन्न-वस्त्र देणारी, संकटकाळी मदत करणारी, सत्कृत्ये करणारी माणस पुण्यवान, सज्जन माणस होत. पांडवाचे राज्य हिसकावून घेणारी, सती द्रौपदीची विटंबना करणारे, सज्जन पांडवांना त्रास देणारे, त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करणारे कौरव पापी विदुर सज्जनांचा पक्ष घेणारा, न्यायी सल्ला देणारा, पांडवाचा म्हणजे सज्जनांचा पक्ष घेणारा, म्हणून तो पुण्यवान माणूस. आपण स्वत दुष्ट, पापी बनू नये. एवढेच नव्हे तर दुष्ट, पापी लोकांची संगतसुध्दा धरू नये. त्यांच्या कार्यात मदत करू नये, त्यांचा मानमरातब स्वीकारू नये. त्याच्या ऐश्वर्याचा लाभही घेऊ नये, हेच श्रीकृष्णांनी आपल्या वागणुकीत दाखवून दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा