'राजे शिवाजी
(जन्म वैशाख शुध्द द्वितीया शके १५४९ (१९ फेब्रुवारी १६३०) - मृत्यू - ३ एप्रिल १६८०, दुपारचे बारा)- ज्यांचे ज्यांचे या भारतावर व भारतीय संस्कृतीवर प्रेम आहे, अशा व स्फूर्तिस्थान असलेल्या छत्रपती शिवरायांची आज तारखेप्रमाणे जयंती आहे. जवळ जवळ साडेतीनशे वर्षांच्या त्या काळ्याकुट्ट कालखंडात धर्मवेड्या अशा परधर्मीय राज्यकर्त्यांनी व त्यांच्या हस्तकांनी इथल्या जनतेवर केलेल्या अत्याचारांची ती भयानक चित्र मन चक्षूसमोरून सरकू लागली की, आजही अंगावर काटा उभा राहतो. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, दिल्लीची मोगलशाही, गोव्याची पोर्तुगीजशाही आणि जंजिऱ्याची सिद्दिशाही अशा चार-पाच जुलमी राजवटींखाली एकदर जनता चिरडली-भरडली जात होती. देवळे पाडली जात होती, मूर्ती फोडल्या जात होत्या, बाटवाबाटवी शिगेला पोहोचली होती. लोकांची लुटालूट करून गावेच्या गावे बेचिराख केली जात होती आणि स्त्रियावर केल्या जाणाऱ्या अत्याचारांना तर सीमाच उरली नव्हती. पण आपल्या धर्माच्या व संस्कृतीच्या बंधु-भगिनींवर असे पाशवी अत्याचार चालू असतानाही त्या वेळचे शूर, बुद्धिमान पण स्वत्व हरवून बसलेले बरेचसे मराठे त्या शाह्यांच्या सरदारक्या स्वीकारण्यात व त्याची राज्ये दृढमूल करण्यात भूषण मानीत होते. याला एकच ज्वलंत अपवाद निघाला तो म्हणजे शिवनेरीवर जिजामातेच्या उदरी सन १६३० शके १५४९ मध्ये जन्माला आलेला शिवबा! या शिवबाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन, त्याच्या साक्षीने आपल्या सवंगड्यांना सांगितले. 'यापुढे हे अत्याचार कायमचे थांबविण्यासाठी स्वराज्य स्थापन केले पाहिजे, तेव्हा स्वराज्य स्थापनेसाठी यापुढे आपण जिवाच रान केलं पाहिजे.' शिवरायांचा हा तेजस्वी संदेश ऐकून त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगात वीरश्रीचे वारे सचारले. म्हणूनच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी तोरणागड घेतला आणि त्यानंतर शत्रूचे गडामागून गड व प्रदेशामागून प्रदेश जिंकून, त्यांनी स्वराज्याचा केवढातरी विस्तार केला. या झंझावाती वीराला मारण्यासाठी पैजेचा विडा उचलून विजापूरहून आलेला अवाढव्य अफझलखान हाच त्या वीराच्या बिचव्याला बळी पडला. मोगलातर्फे पुण्यास आलेला शाहिस्तेखान एका हाताची बोटे गमावून दिल्लीस परत गेला आणि कपटी औरंगजेबाने या वीरश्रेष्ठला बोलावून घेऊन आग्यास नजरकैदेत ठेवले असता, हा युक्तिबाज वीर आपल्या मुलासह मिठाईच्या पेटाऱ्यातून पसार झाला. महाराजांच्या अगी धाडस, चातुर्य, शौर्य, मुत्सद्देगिरी, गरिबांविषयी कणव, धर्मनिष्ठा, परधर्माच्या बाबतीत सहिष्णुता, मातृ पितृभक्ती, सताविषयी आदर, अन्यायाची चीड असे सर्वच सद्गुण त्याच्यात होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा