epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

एका शेतकऱ्याचे / शेतमजुराचे आत्मकथन

               एका शेतकऱ्याचे / शेतमजुराचे आत्मकथन 



                     एखादे फुटत असे माझे जीवन आणि जगणे आहे. जगणे आणि मरणे यातील सीमारेषाच पुसून गेल्या आहेत. आमचे जगणे मरणाहून भयावह आणि मरणे त्याहून कंगाल असते. 

                बागेत काही फुलं सुगंधी असतात, काही फुलं सुरंगी असतात आणि काही फुलं रंगगंधहीन असतात. आजचा शेतकरीही असाच त्रिगुणी आहे. 

               सुगंधी शेतकरी म्हणजे लॉबीवाले शेतकरी. शुगर लॉबी, कॉटन लॉबी, आरेंज लॉबी असे लॉबीवाले शेतकरी आजचे अनभिषिक्त सम्राट आहेत. ते धनकनकसंपन्न आहेत. त्यांच्याजवळ बंगले आहेत, मोटारी आहेत, पैसा आहे, सारेच काही आहे. पैसा आहे म्हणून त्यांना प्रतिष्ठाही आहे. हे आर्थिक सशक्त व सामाजिक प्रतिष्ठित शेतकरी राजकारण खेळण्यात चतुर आहेत. ते सत्ताधीशांना पैसा पुरवतात आणि सत्तेच्या हाती असलेले कायदे आपल्या बाजूने झुकवून घेतात. पदावर कुणीही असला तरी खरी सत्ता यांचीच चालते, कारण यांच्याशिवाय राजकारणी, लोकांचे पान हालत नाही. एखाद्याला पदावर बसवणे किंवा त्याला खाली उतरवणे हे देखील त्यांना शक्य व्हावे. एवढे सामर्थ्य त्यांच्यात असते. त्यांचा गंध साऱ्या प्रदेशात दरवळतो, म्हणून हे सुगंधी शेतकरी ! 

               सुरंगी शेतकऱ्यांना असा गंध नसतो, पण त्यांना रंग निश्चितच असतो. निवडणुकीत ते आपला रंग दाखवूनच देतात. त्यांच्याजवळ घोडा गाडी नसली तरी उपजीविकेपुरती शेती निश्चितच असते. यांची संख्या मोठी आहे. आजवर ते विखुरलेले होते म्हणून त्यांची ताकद दिसून येत नव्हती. पण आता ते संघटित झाले आहेत, होत आहेत. महाराष्ट्रात शेतकरी संघटना आणि शरद जोशी हे सुरंगी शेतकऱ्यांचे प्रतीक आहे. आपल्या संघटित शक्तीच्या बळावर ते कांद्याचा भाव ठरवू शकतात, त्यासाठी संघर्ष करू शकतात. त्यांच्यात विलक्षण राजकीय जागृती निर्माण झाली आहे. मंत्र्यासाठी 'चक्का जाम' करण्याची त्यांची हिंमत जगाने पाहली आहे. कर्जमुक्तीचा फायदाही त्यांनाच मिळाला आहे..

               रंगगंधहीन शेतकऱ्यांचा मात्र अजूनही कुणी वाली नाही, हे फारच थोड्या जमिनीचे मालक किंवा शेतमजूर आहेत. बाजारपेठेत कांदा पाठवण्याइतपत कांदा त्यांच्याजवळ नसतो. म्हणून कांद्याचा भाव वाढून न वाढून या शेतकऱ्यांवर त्याचा काहीच फरक पडत नाही. कारण यांचे उत्पादन केवळ उदरनिर्वाहापुरते असते. यांना कुणी कर्ज देत नाही. कारण कर्ज घ्यायला हवे असलेले सोने यांच्याजवळ नाही. रक्ताचे पाणी करून ते माल पिकवतात. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ते आपला माल आठवडी बाजारात आणतात. त्यालाही भाव मिळाला नाही म्हणजे रक्ताचा चिखल तुडवत असतात. शेतकरी सुखी तर जग सुखी असे निबंध त्यांच्या पोरांनी शाळेत लिहावेत, घरी आल्यावर मात्र त्या पोरांना पोटभर जेवायलाही देता येऊ नये असे जनावरांचे जिणे ते जगत असतात.

                 मी शेतमजूर आहे. आभाळाचा ढोल वाजत असतो. विजेचे नृत्य सुरू असते. पाऊस अंगाला चाबकाचे फटकारे मारत असतो आणि मी माझ्या दोन मुक्या सोबत्यांसोबत नांगरणी करत असतो. माझ्या या सोबत्यांना बोलता येत नाही आणि मला बोलता येत असूनही मी बोलू शकत नाही. भावना मात्र एकच आम्ही रक्ताचे पाणी देऊन मळा फुलवावा आणि मळेमालकाने पाण्याच्या भावात आमचे रक्त विकत घ्यावे. 

              शेतातल्या मातीतला काटा पायात रुततो. रक्त निघते, ते माझ्या मनाला रक्तबंबाळ करते, पण तरी मला या समाजरचनेचा क्रोध येत नाही, कारण तू आपले कर्तव्य कर, फळाची आशा धरू नकोस.' असे गीता सांगते. संध्याकाळी पोरांना पोटभर खाऊ घालता येत नाही. त्यांची व्यथा बघवत नाही, म्हणून देवळात निघून जातो. तेथे तुकोबाचा अभंग कानावर पडतो, 'ठेविले अनंते तैसेचि राहावे। चित्ती असू द्यावे समाधान पण उपाशी निजलेली पोरे पाहून चित्तो समाधान कसे असू द्यावे तेच मला कळत नाही. यावेळी ज्ञानेश्वर माझ्या साह्याला धावून येतात. गीतेच्या भावानुवादातून त्यांनी सांगितले आहे की सज्जनाच्या रक्षणाकरिता परमेश्वर अवतार घेत असतो. आज ना उद्या परमेश्वर अवतार घेईल आणि आपले दैन्य दूर होईल यावर माझी श्रद्धा बसते. मग देवळात जाऊन मी भजन करत बसतो. 

               हा अवतार दुष्टांच्या निर्दालनाकरितादेखील असतो. व्यापारी काळाबाजार आणि भेसळ करतात. न्यायाधीश पैसे खाऊन न्याय फिरवतात, शिक्षक पैशासाठी पेपर फोडतात. आमदार, खासदार पैशाच्या वजनाने जनतेचा विश्वासघात करून पक्ष बदलतात. कुणी 'भूखंड, तर कुणी 'बोफोर्स, आणि कुणी 'हवाला' प्रकरणात अडकतात. कुणी दाऊद इब्राहिम होतो, कुणी तस्कर बनतो, आणि समाजातले अनेक हर्षद मेहता पैशाची अफरातफर करतात. परमेश्वराचा अवतार एकाच वेळी या सर्वांचा विनाश कसा करणार? हाही प्रश्न माझ्या मनात उद्भवून जातो.

             'भारतीय शेतीपुढील आव्हाने' या लेखात अण्णासाहेब शिंदे म्हणतात की सर्व प्रगतीच्या मुळाशी सार्वजनिक धोरणे महत्त्वाची असतात. ती निश्चित स्वरुपाची ठरवली गेली पाहिजेत. शेतीच्या बाबतीत रक्तपात टाळून प्रगती कशी करता येईल याचा विचार करायला हवा असे ते म्हणतात. 

            मलाही रक्ताची तरल क्रांती मानवत नाही. पण त्याविना समाजरचना बदलण्याची थोडीही चिन्हे दिसत नाहीत आणि तीच्या मागन नही माझ्या आक्रोशाच्या ज्वालामुखीतून लाव्हा कधी उसळतो याची मी वाट पाहत आहे, कारण 'वरुनि शांत हा गिरी धुमसते आग परि अंतरी' **

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा